हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

बीड (प्रतिनिधी):-
बीड जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी, अपघातांची प्रमुख कारणे ठरणाऱ्या निकृष्ट व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंभा ते लोखंडी सावरगाव तसेच पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते अनपटवाडी या राष्ट्रीय महामार्गांवरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, कामांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूरचे विभागीय कार्यकारी अभियंता प्रविण सुमंत आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे चौकशी करण्याऐवजी कंत्राटदारांची बाजू घेत दर्जेदार काम असल्याचे प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात लक्षवेधी आंदोलन
या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली दि. 9 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हेल्मेट घालून लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निकृष्ट रस्ताकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या

प्रविण सुमंत व राजेंद्र भोपळे यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी,
राष्ट्रीय महामार्गांवरील निकृष्ट रस्ताकामाची सखोल चौकशी करावी,
दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी,
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरनाका दरम्यान दुभाजकात यू-टर्न सुविधा उपलब्ध करून द्यावी,
वरिष्ठ स्तरावर निवेदन

या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी),रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक बीड) नितीन सोनावणे ( जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना), सय्यद सादेक (बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी)यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *