हिंगोली जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट

नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हिंगोली, (जि. प्रतिनिधी) : – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज गुरुवारी जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवर दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून पायी अथवा वाहनाने जाण्याचे धाडस करू नये. तसेच नदीकाठावरील पर्यटनस्थळांवर निर्धारित सुरक्षित मर्यादेपलीकडे जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचना व इशारे यांच्यावरच विश्वास ठेवावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *